PAHSKY Karjamafi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पोर्टलवर दिसणारी कर्जमाफीची रक्कम आणि प्रत्यक्ष थकीत कर्जरक्कम यामध्ये तफावत दिसत असल्याने राज्यभर शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तर आता तफावत बाबत राज्याचे कृषिमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी खुलासा केला आहे की, ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जरक्कम दोन लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाणार असून, पोर्टलवर कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. (PAHSKY Karjamafi)
तसेच पुढे कृषिमंत्री म्हणाले की, राज्य सरकार आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ‘हेअरकट’ संदर्भात झालेल्या करारानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे शासनाकडून मंजूर होणारी रक्कम काही शेतकऱ्यांना कमी दिसत आहे. मात्र, शासनाकडून दिसणारी रक्कम अंतिम कर्जमाफीची रक्कम नसून, उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँकांकडून हेअरकट करारानुसार समायोजित केली जाणार आहे. (PAHSKY Karjamafi)
त्यामुळे, “दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जाईल. शासनाकडून मिळणारी रक्कम आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून समायोजित होणारी रक्कम मिळून संबंधित शेतकऱ्याच्या खात्यातील संपूर्ण थकबाकी निकाली काढली जाईल. त्यानंतर त्या शेतकऱ्याला शून्य थकबाकीचा दाखला दिला जाईल आणि नव्याने पीककर्जही उपलब्ध करून दिले जाईल,” असे ही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. (PAHSKY Karjamafi)








