Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नाव यादीत नसेल तर घाबरू नका, त्यांच्या नावाचा समावेश करू, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी दिनांक 28 जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यादीत नाव न आल्याने जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. (Farmer Loan Waiver)
माननीय कृषिमंत्री म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या याद्या शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची जशी पूर्तता होईल, तशा प्रसिद्ध केल्या जातील. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत, त्यांची नावे यादीत नसतील, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली की, त्यांचं नाव यादीत येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका.” असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे. (Farmer Loan Waiver)
कर्जमाफीची रक्कम कमी?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २ लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज करण्यात येणार आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम यादीत कमी दाखवण्यात येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. याबाबत आमदार कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांचं २ लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे. परंतु काही ठिकाणी चुका झाल्या असतील वा तक्रारी असतील तर त्या लक्षात घेऊन दुरुस्त करून २ लाख रुपयांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात येतील” अशी ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिली आहे. (Farmer Loan Waiver)








